मंदिराची साडी
“आवं उद्या पुन्याला जाऊया” बायजाक्काने गळ घातली.
“का वं? आसं एकदम उठून पुन्याला का?” दाजींनी प्रश्न केला.
“मला नवी साडी घ्यायची हाये.”
“आगं! पन तालुक्याच्या बाजारात मिळल की. त्यासाटी पुन्याला का जायचं?”
“मला पेशल साडी हवीय अवंदा. साडीवर पंढरी, कोल्हापूर, आट इनायक आनि म्हाराष्ट्रातील समद्या मोट्या मंदिरांची चित्र हवीत.”
“ऑं! आनि ती कशापायी?”
“आवं! आता आषाढी येकादशी येईल, नागपंचमी, गनपती, गौरी. आपल्याकडं सनासुदीला ह्ये इतकं दिवस हायेत, मंग पेशल साडी नगं का?”
“पर आसं मंदिरांचं फोटू चिकटवलेली साडी गावेल का?”
“न गावायला काय झालंया? त्या मंदिराला गावली की वं! ती बगा अंगभर देसांच झेंड लावून आली होती. काय झ्याक दिसते बाय! मला पन अशीच साडी हवी.”
“आस्स!!! आता कळतया की तुज्या टकुर्यात काय हाय ते आनि लोकांनी बोभाटा केला तर? मंजी सरळ सांगायचं तर बसायच्या जागंवर येखादं मंदिर आलं तर काय करायचं? मानसं बगून घेनार न्हाईत. शिमगा करतील.”
“ते का वं! मंदिरानं केलं तर कवतुकानं बगतात. म्या बाईने केलं तर कशापायी वरडतील?”
“नाय गं! मंदिरानं केलं तरी बी वरडतातच हायेत.”
“आनि त्यानं काय व्हनार ते सांगा? मंदिराला चार शिनुमे मिळतील, टिवीवरच्या दोन मालिका मिळतील. चेंडू-फळी तर आजकाल लोक तिच्यापायीच बगतात. मी सांगते ते आयकाच, मला साडी घिऊन द्या. लोकांनी ठनाना क्येला तरी नंतर फायदा माजाच हाय.”
“आता यात फायदा कोन्ता म्हनतू मी, बायजा?”
“आवं, निवडनूक हाय सरपंचाची. या टायमाला बाई सरपंच पायजे ना. तुमीच म्हनाला ना की तू उबी रहा म्हनून. आता मला बाईला कोन वळखतंय आनि मत देतयं? ह्ये लोकांनी आपल्याला वळखायंच मंजी कायतरी जंक्शन कराया लागतं बगा! मला साडी घिऊन द्या, न्हाय समद्या गावांत माजा बोलबाला झाला तर बगा.”
“बायजे! मानलं गं बाई तुला. आगं तू म्हनतेस त्यात प्वाईंट हाय बाकी. तुला उद्याच्या पैल्या गाडीने पुन्याला घिऊन जातू.”
कारणे द्या नोटिस – १
गेले काही दिवस आम्ही भयंकर व्यग्र होतो. आमच्या काही मित्रांना आम्ही काय करत होतो हे जाणायचे आहे या इच्छेतून इतक्या दिवसांत आम्ही कोणते पापड लाटले ते सांगणारे भाग उलट्या क्रमाने येथे टंकत आहोत.
तर, अगदी आता आतापर्यंत आम्ही “कारणे द्या” नोटीशीला उत्तर देत होतो. नाही! कोणाला कारणे द्यावीत असा आमचा पिंड नाही आणि असे आम्ही फारसे काही उपद्व्याप केलेलेही नाही परंतु आमच्या दोघा खास मित्रमैत्रिणींवर ही नोटिस बजावण्यात आली होती आणि त्यांनी उत्तरे लिहायची जबाबदारी आमच्या गळ्यात टाकली. त्यापैकी पहिल्या कारणे द्या नोटिशीला आम्ही दिलेले उत्तर:
ही नोटिस आमचे परममित्र अभिषेक बच्चन यांच्यावर करिश्मा कपूर यांनी बजावली होती. नोटिशीत, कधीकाळी मोडलेले लग्न आणि आता लग्नाला न आमंत्रित केल्याबद्दल कारणे विचारली होती. तेव्हा अभिषेकच्या वतीने आमचे उत्तर पुढीलप्रमाणे.
श्रीमती करिश्मा कपूर यांस,
गोष्ट जुनी झाली म्हणून बदलत नाहीत. लग्न तुम्ही मोडले आणि तेव्हा कारणे देताना तुम्ही अभिषेकचे टुकार चित्रपट, त्यांच्या वडिलांचे आताही प्रसिद्धी पावणारे चित्रपट, जयाकाकूंचे तुमच्यापेक्षा लांब असणारे केस, तुमच्या मातोश्री बबिताताई यांनी प्रतीक्षा बंगल्यात वेगळी खोली देण्यास परवानगी नाकारणे असे अनेक मुद्दे उठवले होते. असो, आमचेही काही प्वाईंट होतेच तेव्हा आता आम्ही आमच्यावतीने कारणे देतो….
१. लग्नानंतर आदर्श सूनबाई बनून राहणार नाही असा तुम्ही घेतलेला पावित्रा. आपण जे जन्मभर सहन केलं त्याचा वारसा आता सुनेने चालवावा अशी आमच्या जयाकाकूंची माफक अपेक्षा होती, त्याला तुमची नाराजी दिसली. आमची ऐशू पहा कशी अंगभर पदर पांघरून उभी असते. मध्यंतरी जयाकाकूंना लाइफ टाईम पुरस्कार मिळाला तेव्हा खाली बसून डोळ्यातून पाणी काढत होती पोरगी. तिने जसे आम्हाला ‘क्रेझी कर डाला’ तसे तुम्ही कधी केले नाही म्हणून.
२. आपला चिरका आवाज आणि सालीचा म्हणजे करिनाचा हो! (गैरसमज नको) चिरका आवाज यांनी जयाकाकूंचे ब्लडप्रेशर वाढत असे. जन्मभर ते सहन करण्याची ताकद थोरल्या डॅडीसाहेबांतही नव्हती. आता पुन्हा लग्नाला आमंत्रित करून मंगलाष्टकांच्या वेळेस तुम्ही भगिनीगान सुरू केले तर गोंधळ, पळापळ उडायला नको म्हणून आमंत्रण दिले नाही, इतकेच!
३. मागे लग्न ठरले तेव्हा आपल्या मातोश्रींनी भरभक्कम हुंडा देते असे कबूल केल्याचे आठवते. हुंड्यात भरभक्कम म्हणजे त्या स्वत: याची आम्हाला कल्पना नव्हती. ती आल्यावर आम्ही हादरून गेलो.
४. आपल्या पिताश्रींनी प्रतिक्षावरील एका बैठकीत थोरल्या डॅडीसाहेबांचा संपूर्ण बार निकामी केल्याचे (अर्रर्र! संपवल्याचे) लक्षात आल्याने हे प्रकरण आपल्यालाच काय पण प्रत्यक्ष कुबेरालाही परवडणारे नाही हे आम्हाला लक्षात आले.
५. लग्नातील आपल्या काही अटी फारच जाचक होत्या. जसे, लग्नात शाहरुखला पहिल्या रांगेत बसवून अमरसिंहांना पाचव्या रांगेत बसवावे. किंवा तुमच्या लाडक्या गोविंदाची आणि कॉंग्रेसपक्षाचे बोर्ड लग्नसमारंभात लावावेत. हे ही आम्हाला परवडण्यासारखे नव्हते.
एवढे मुद्दे पुरेसे असावेत असे आम्ही समजतो.
कळावे, लोभ असावा.
आपला,
(चमचा) बेधडक.
पुढचे उत्तर सल्लूला.
कर्मन्यास: यातील कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. हे प्रसंग केवळ कपोलकल्पित आहेत.