क्योंकी सांस भी कभी….
वेळ — सकाळी ११ ची.
स्थळ — स्वयंपाकघर.
काळ – अगदी आताचाच, पुढच्या महिन्यातला नाही तर त्याच्या पुढच्या.
स्वयंपाकघरातून हिंग, कढीपत्ता, मोहरीची चरचरीत फोडणी दिल्याचा आवाज आणि घमघमाट सुटला होता. वास जयाकाकूंच्या नाकात भिनला होता. त्यांनी आपल्या नाकावर पदर दाबून धरला आणि तरातरा त्या स्वयंपाकघरात शिरल्या. ऐशू कपाळावरची बट हलकेच बाजूला सारून घर्मबिंदू आपल्या पदराने टिपत होती आणि गॅसवरच्या पातेल्यात डोकावत काहीतरी ढवळत होती आणि ‘दय्या दय्या दय्या रे!’ असं काहीसं गुणगुणत होती.
जयाकाकूंनी तिला तावातावाने विचारले,”तुमी कि कोरो, बहु?”
“येन अम्मा? ” ऐशू तालात म्हणाली, “अभीसाठी बिस्सिबेळेअन्ना आणि रस्सम बनवते आहे.”
“छी! छी! अम्मा बिम्मा म्हणू नकोस मला आणि अभी रस्सम, फस्सम नाही खात. त्याला छोलार दाल, माछ, भप्पा दोई सगळे बंगाली पदार्थ आवडतात हो.” जयाकाकू ठसक्यात म्हणाल्या.
“भप्पा म्हणजे ते तुमचे भप्पी लाहिरी त्यांचे चिरंजीव का?” ऐशूने आपले सामान्यज्ञान पाजळले.
भस्सकन कुकरची वाफ निघावी तशा जयाकाकू फुदफुदल्या,”भप्पा म्हणजे वाफवलेलं. स्टीम्ड! काय बाई तरी अक्कल आहे.”
“हे पाहा माझी अक्कल काढायचं कारण नाही. विश्वसुंदरीचा किताब आहे माझ्याकडे तो काही केवळ माझ्या तोंडाकडे आणि फिगरकडे पाहून नाही दिलाय,” ऐशूच्या नाका, तोंडा, कानातून वाफा यायच्या बाकी होत्या, “अभीपेक्षाही माझी अक्कल जास्त आहे हे सगळ्या जगाला माहित आहे.”
“हो तर! एकतर तू त्याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेस त्यामुळे तुझी अक्कल जास्त असायचीच आणि दुसरं म्हणजे अभीने तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हाच जगाला कळलं हो की त्याची अक्कल किती आहे ते,” जयाकाकूंनी कुजकट टोमणा मारला.
ऐशूच्या हिरव्यागार टपोर्या डोळ्यांत पाणी तरारले. आपला लोरिएलचा कलर फॅब्युलस मस्कारा त्या अश्रूंत विरघळणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन तिने आपले डोळे टिपले.
“एंक गोत्थु! तुमच्या मनात ती बंगाली राणी होती, मी अभीला गटवलं म्हणून तुमची धुसफुस सुरू असते.”
“हो तर! तुम्ही मद्रासिणी सगळ्याच तरबेज आहात पुरूषांना गटवण्यात. हेमा, श्रीदेवी, जयाप्रदा, तू”
“मस्त उपकारा!”, फणकार्याने ऐशू म्हणाली,”मी मद्रासी नाही पण तुम्हा उत्तर भारतीयांना ते सांगून फारसा उपयोग नाही म्हणा, आणि अम्मा! रेखाआंटीला विसरलांत का हो? ” आपल्या पापण्या फडफडवत ऐशूने लाडिक आवाजात विचारले.
जयाकाकूंना काय बोलावे सुचत नव्हते, संतापाने त्या धुसफुसत होत्या, “हे पहा आमच्या घरात राहायचं तर मिळून मिसळून राहावं लागेल.”
ऐशूने नाकाचा लाल झालेला शेंडा ओढला आणि सूंऽऽ असा दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली,”पुढल्यावेळी त्या ऑप्र्हा विन्फ्रीने मला बोलावलं ना तर तिला मी सरळ सांगणार आहे की आम्हा भारतीय बायकांना आपल्या आईवडिलांच्याच नाही तर सासू-सासर्यांच्या कह्यातही राहावे लागते. अजूनही या पारंतंत्र्यात खितपत पडलो आहोत आम्ही. एवढी हिर्यासारखी सून मिळाली तर त्याचे कौतुकही नाही तुम्हाला.”
“कौतुक आहे की पण हा हिरा है सभी के लिए त्याचं काय? तुझ्यासारख्या भारतीय बहुपेक्षा एखादी विदेशी बहु आणली असती तर परवडलं असतं पण विदेशी बहु म्हटलं की अमितच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.” खट्टू होऊन जयाकाकू म्हणाल्या.
“जाणारच! त्यांनी तुम्हाला ‘लाभाचे पद’ म्हणून राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावला, आणि मी; नाही तुम्हाला या स्वयंपाकघराचा राजीनामा द्यायला लावला तर पहा.”
आता डोळे टिपण्याची पाळी जयाकाकूंची होती. तेवढ्यात मागून तेजींचा आवाज आला,”घरोघरीच्या सविता आणि तुलसी तुमची जुगलबंदी संपली असेल तर ताटं वाढायला घ्या हो! अमित आणि अभी यायची वेळ झाली, या तुमच्या “बा”ने सर्वांसाठी पंजाबी खाना कधीच पकवला आहे.”
yogesh said,
February 28, 2007 at 2:59 pm
bhagyashree said,
February 28, 2007 at 6:06 pm
haha.. faarch sahi lihlay !! khuup hasle !!
anu said,
March 1, 2007 at 3:23 am
Chhan lihile ahe. Pan teji bachchan punjabi ahet? Mala vatale ilahabadi ahe sarv parivar..
bedhadak said,
March 1, 2007 at 10:48 am
धन्यवाद योगेश आणी भाग्यश्री.
भाग्यश्री ते तुमचे हाहाहीही मजेशीर आहे.
अनुताई
अनेक धन्यवाद. आमच्या सामान्यज्ञानानुसार तेजी बच्चन शीख असून हरिवंशराय बच्चनयांच्या द्वितिय पत्नी होत.